
घाटलावासिय नागरिक आंदोलनाच्या पवित्र्यात
मुंबई- गेल्या ५० वर्षांहून अधिक काळ चेंबूरकरांची शान असलेले घाटले गाव परिसरातील मैत्री पार्क एसटी स्थानक स्थलांतरित करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.त्यामुळे स्थानिक घाटलावासि नागरिक आणि प्रवासी वर्ग संतप्त झाला आहे. हे एसटी स्थानक हटविण्याच्या प्रयत्नाला विरोध करण्यासाठी या सर्वानी व्यापक स्वाक्षरी मोहीम सुरू केली आहे. तसेच लवकरच तीव्र जनआंदोलन छेडण्याचा इशारा या सर्वानी दिला आहे.
काल शनिवारी पहिल्याच दिवशी या स्वाक्षरी मोहिमेला हजारो नागरिकांसह सर्वपक्षीय नेते,
पदाधिकारी,सामाजिक कार्यकर्त्यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून जाहीर पाठिंबा दर्शविला.
स्थानिक सामाजिक कार्यकर्ते अनिल साळवी यांनी माहिती अधिकार अर्जाद्वारे मिळवलेल्या माहितीतून हे एसटी स्थानक स्थलांतरित करण्यासाठी एमएमआरडीएचा प्रस्ताव असल्याचे उघड झाले.या माहितीनंतर अनिल साळवी यांनीच स्थानिक नागरिकांना सोबत घेऊन हे या आंदोलनाला सुरुवात केली आहे.सायन- पनवेल मार्गावरील मैत्री पार्क एसटी स्थानक हे एकमेव स्थानक असून अगदी घाटकोपर,मुलुंड
पर्यंतच्या नागरिकांना प्रवासासाठी अत्यंत सोयीचे असे ठिकाण आहे.सर्व सणासुदीला हे स्थानक प्रवाशांनी गजबजले दिसते. या स्थानकाशी स्थानिक नागरिकांचे भावनिक आणि जिव्हाळ्याचे नाते आहे.त्यामुळे हे एसटी स्थानक वाचविण्यासाठी स्थानिक नागरिकांनीच अखेरपर्यंत लढा देण्याचा निर्धार व्यक्त केला.



