वाणगाव मधील तरुण अभियंत्यांनी विकसित केला संशोधन ते उत्पादन प्रक्रियेसाठी एआय प्लॅटफॉर्म

पालघर जिल्हा प्रतिनिधी
देशातील तंत्रज्ञान क्षेत्रात मोठी झेप घेत पालघर जिल्ह्यातील वाणगाव या छोट्याशा गावातील तरुण अभियंत्यांनी कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (AI) क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. संशोधनातील कल्पना प्रत्यक्ष इलेक्ट्रॉनिक उत्पादनात रूपांतरित करण्याची संपूर्ण प्रक्रिया एकाच एआय प्लॅटफॉर्मवर सक्षम करणारे तंत्रज्ञान विकसित केल्याचा दावा चंद्रहास टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेड आणि त्यांच्या WeBiii Traume Private Limited या विशेष उद्देश कंपनीने (SPV) केला आहे. संशोधन, सर्किट डिझाइन, पीसीबी, फर्मवेअर, उत्पादन निर्मिती आणि क्लाउड कनेक्टिव्हिटी अशा सर्व टप्प्यांना एकत्र जोडणारा हा प्लॅटफॉर्म भारतातील नावीन्यपूर्ण तंत्रज्ञान विकासासाठी महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.
२०१६ मध्ये शिवम गोसावी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आयटी सेवा देणारी कंपनी सुरू केली होती. मात्र, केवळ वेबसाइट आणि सॉफ्टवेअर विकसित करण्यापेक्षा भारतात स्वतःचे तंत्रज्ञान आणि संशोधनाधारित उत्पादने निर्माण करण्याचे ध्येय त्यांनी स्वीकारले. आयटी सेवेतून मिळालेली संपूर्ण कमाई आणि स्वतःची बचत संशोधनात गुंतवत त्यांनी स्मार्ट होम, कृषी तंत्रज्ञान आणि इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनांच्या विकासाला सुरुवात केली. या प्रवासात त्यांनी कोणतीही बाह्य आर्थिक मदत किंवा गुंतवणूक स्वीकारली नाही.
सुमारे नऊ वर्षांच्या सातत्यपूर्ण संशोधनानंतर विकसित झालेला हा एआय प्लॅटफॉर्म वापरकर्त्याच्या साध्या कल्पनेपासून प्रत्यक्ष उत्पादन तयार होईपर्यंत आवश्यक असलेली संशोधन प्रक्रिया, इलेक्ट्रॉनिक सर्किट डिझाइन, पीसीबी, फर्मवेअर, उत्पादन प्रक्रिया आणि क्लाउड एकत्रीकरण अशा सर्व टप्प्यांमध्ये मदत करतो. त्यामुळे विशेषतः सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना (MSME) उत्पादन विकासासाठी लागणारा वेळ, खर्च आणि तांत्रिक गुंतागुंत मोठ्या प्रमाणात कमी होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
या प्लॅटफॉर्ममध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेच्या संभाव्य चुका टाळण्यासाठी सत्यापित तांत्रिक माहितीचा स्वतंत्र ज्ञानसाठा, Retrieval Augmented Generation (RAG), Graph Neural Networks (GNN) आणि तर्काधारित पडताळणी प्रणालीचा वापर करण्यात आला आहे. त्यामुळे एआयने दिलेल्या सूचनांची पडताळणी करून अधिक अचूक, विश्वासार्ह आणि सुरक्षित परिणाम मिळवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
चंद्रहास टेक्नॉलॉजीजने यापूर्वी AutomatiCH®️ या ब्रँडअंतर्गत भारतात डिझाइन केलेली स्मार्ट होम उपकरणे विकसित करून बाजारात आणली होती. त्या प्रत्यक्ष अनुभवातून मिळालेले ज्ञान, संशोधन आणि तांत्रिक कौशल्य या नव्या एआय प्रणालीमध्ये समाविष्ट करण्यात आले आहे.
या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी कंपनीने सुमारे १.६ कोटी रुपयांची स्वतःची गुंतवणूक केली असून हजारो तास संशोधनासाठी खर्च करण्यात आले. आर्थिक अडचणीच्या काळात संस्थापक शिवम गोसावी यांनी स्वतःची कार विकूनही संशोधनाचा प्रवास थांबू दिला नाही. सहसंस्थापक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी (COO) आरती गौतम सावंत यांनीही कठीण परिस्थितीत कंपनीची साथ कायम ठेवत या प्रकल्पात मोलाचे योगदान दिले.
भविष्यात हा प्लॅटफॉर्म शालेय विद्यार्थ्यांना अत्यल्प शुल्कात उपलब्ध करून देण्याचा कंपनीचा मानस आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही संशोधन, नवकल्पना आणि उत्पादन विकासाची समान संधी मिळावी, यासाठी हे पाऊल उचलण्यात येणार असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे.
स्मार्ट होम, कृषी तंत्रज्ञान, इलेक्ट्रिक वाहने, ड्रोन, रोबोटिक्स आणि औद्योगिक ऑटोमेशन या क्षेत्रांमध्ये भारतीय तंत्रज्ञान अधिक सक्षम करण्याचे उद्दिष्ट कंपनीने ठेवले असून, २०४७ पर्यंत भारताच्या डीप-टेक क्षमतेत भरीव योगदान देण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.



