
ईगल न्यूज अमळनेर प्रतिनिधी एस एम पाटील
भडगाव तालुक्यातील महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या गोठा शेड योजनेचा निधी रखडल्याने तालुक्यातील तब्बल 120 लाभार्थी अद्यापही अनुदानापासून वंचित आहेत. त्या लाभार्थ्यांना शासन स्तरावर प्रयत्न करून तात्काळ निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष श्री अखिलेश पाटील यांनी गट विकास अधिकारी,पंचायत समिती भडगांव यांना निवेदन देऊन केली आहे.
याबाबतचे सविस्तर वृत्त असे की गेल्या वर्षभरापासून रोजगार हमी योजनेअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या गोठा शेड योजनेत तालुक्यातील बरेच शेतकरी पात्र असून त्यांना अकुशल निधीचे देखील वितरण झाले असून कुशल निधीचे अनुदान अद्याप लाभार्थी शेतकऱ्यांना मिळाले नसल्या मुळे त्यांच्या मनात नाराजीचे वातावरण आहे. शेतकऱ्यांनी स्वखर्चातून शेडचे बांधकाम पूर्ण केले असून देखील वर्षभरा पासून राहिलेल्या निधीची वाट बघत आहेत, शेतकरी हितासाठी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी प्रलंबित प्रकरणे लवकरात लवकर मार्गी लावून शासन स्तरावर प्रयत्न करून निधी उपलब्ध करावा व शेतकऱ्यांना अनुदान वितरित करून शेतकऱ्यांना सहकार्य करावे यासंबंधीचे निवेदन आज रोजी शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष श्री अखिलेश पाटील, उपाध्यक्ष वाल्मीक लोखंडे, रामकृष्ण माळी आदी कार्यकर्त्यांनी भडगांव येथे पंचायत समिती कार्यालयात गट विकास अधिकारी यांच्या तर्फे आर डी जगताप सामान्य प्रशासन विभाग पं.स.भडगांव यांना दिले आहे.



