PAT परीक्षा घ्यायची की निवडणूक ट्रेनिंग करायचे?
मे महिन्याच्या सुट्टीतील शिक्षकांचे नियोजन कोलमडले.
मुंबई
संकलित मुल्यमापन चाचणी परीक्षा संदर्भात शिक्षण विभागाच्या परीपत्रकानुसार नव्याने देण्यात आलेल्या सुचनांमुळे शिक्षकवर्गात असंतोष व नाराजीचा सूर उमटला आहे.नियतकालिक मुल्यांकन (PTA) अंतर्गत – संकलित मुल्यमापन चाचणी 2, आणि इयत्ता पाचवी व आठवीची परीक्षा संदर्भात नव्याने सुचना शिक्षण विभागाने जारी केल्या आहेत.
शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने एप्रिल 4,5 व 6 ला PAT परीक्षेचे आयोजन केले आहे. त्याचवेळी मुंबईतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना निवडणूक प्रशिक्षणासाठी बोलावण्यात आले आहे. मुख्याध्यापकांना प्रश्न पडला आहे की PAT परीक्षा घ्यायची की निवडणूक ट्रेनिंगसाठी शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना पाठवायचे? निवडणूक असो व सर्वेक्षण किंवा कोणतेही अशैक्षणिक काम नेहमीच शिक्षकांना टार्गेट करण्याचे काम केले जाते. त्यामुळे दैनंदिन शालेय कामकाज कोलमडते. याचा शिक्षण मंत्र्यांनी कुटुंब प्रमुख म्हणून विचार करावा, अशी मागणी शिक्षक भारती संघटनेचे कार्याध्यक्ष सुभाष किसन मोरे यांनी पत्र देऊन केली आहे.
दर पाच वर्षांनी होणाऱ्या लोकसभा निवडणुका महाराष्ट्रात एप्रिल महिन्यात होत असतात. यावर्षी या निवडणुकांची तारीख 20 मे रोजी ठरविण्यात आलेली आहे. मुंबईमध्ये उत्तर भारत व दक्षिण भारतात मूळ गावी जाणारे हजारो शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आहेत. तसेच दीर्घ सुट्टी असल्यामुळे महाराष्ट्रातील अनेक मुख्याध्यापक, शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परदेशी अथवा देशांतर्गत प्रवासाचे नियोजन यापूर्वीच केलेले असते. अचानक निवडणुकांच्या तारखा मे महिन्यात जाहीर झाल्यामुळे हे संपूर्ण नियोजन कोलमडले आहे. लाखो रुपये भरून कुटुंबासहित बाहेर फिरायला जाण्याचे घेतलेले पॅकेज रद्द करण्याची वेळ शिक्षकांवर आलेली आहे. या होणाऱ्या नुकसानाला जबाबदार कोण? मा. मुख्यमंत्री व मा. शिक्षणमंत्री यांनी याबाबत हस्तक्षेप करावा अशी मागणी शिक्षक भारतीच्या वतीने करण्यात आलेली आहे.
प्रत्यक्ष निवडणूक अथवा जनगणना करणे राष्ट्रीय कर्तव्याचा भाग असल्याने मुख्याध्यापक, शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा त्याला विरोध नाही. परंतु त्याचे योग्य वेळी नियोजन केले तर त्याचा परिणाम दैनंदिन शालेय कामकाज व इतर दैनंदिन गोष्टीवर होणार नाही. वर्षभरात होणारी प्रशिक्षणे, शासनामार्फत जाहीर होणारे सर्वेक्षण हे सर्व शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वी कळवले तर पूर्ण वर्षाचे वार्षिक नियोजन करणे शाळांना सोपे जाते. पण नेहमीच शालेय शिक्षण व्यवस्थेला गृहीत धरून विविध अशैक्षणिक कामे लादण्याचे काम होत असल्यामुळे संस्थाचालक, मुख्याध्यापक, शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष वाढत चालला आहे.शालेय शिक्षण विभागाच्या कोणत्याही कामासाठी आमचा विरोध नाही. राष्ट्रीय कर्तव्य म्हणून आम्ही सर्व कामे करण्यातसाठी तयार आहोत असे मत उत्तर मध्य मुंबईतील शिक्षिका दीपिका शर्मा यांनी व्यक्त केले तर आरती जैन यांच्या मते शैक्षणिक परीक्षा व मुल्यमापन स्वरूप याचे नियोजन शैक्षणिक वर्षांच्या सुरुवातीला म्हणजे जुन महिन्यात जाहीर झाले पाहिजे त्यानुसार अध्ययन – अध्यापन प्रक्रिया सुरळीत पार पडेल अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. शिक्षक भारतीचे कार्याध्यक्ष व मुंबई शिक्षक मतदार संघाचे श्री सुभाष मोरे या संदर्भात शिक्षक मंत्री दीपक केसरकर यांना पत्र लिहून साकडे घातले आहे.