बीड येथे घडलेली घटना दुर्दैवी : राजेश नाईक
कोल्हापूर : (वर्षाराणी दुर्गे सरुडकर) : शेतकऱ्यांने फड पेटवून देत, गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना बीड जिल्ह्यात घडली आहे. ती घटना पुरोगामी महाराष्ट्राला न शोभणारी आहे. राज्यातील बहुतेक साखर कारखाने हे राष्ट्रवादीचे असल्याने या घटनेबाबत राज्यातील आघाडी सरकारला कोणतेही सुतक नाही, अशी घणाघाती टीका शेतकरी संघटनेचे नेते राजेश नाईक यांनी केली आहे.
बीड जिल्ह्यात अतिरिक्त उसाचा प्रश्न पेटला आहे. तोडणीला आलेला ऊस कारखाना घेऊन जात नसल्याने, 30 वर्षीय तरुण शेतकऱ्याने चक्क ऊस पेटवून देत, ऊसातील लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.
ही धक्कादायक, संतापजनक घटना, बीडच्या गेवराई तालुक्यातील हिंगणगावमध्ये घडली आहे. नामदेव आसाराम जाधव (रा. हिंगणगाव ता. गेवराई जि. बीड) असं गळफास घेतलेल्या शेतकऱ्याचं नाव आहे. जाधव यांना एकूण 2 एकर शेती असून त्यांनी शेतामध्ये 265 जातीचा ऊस लागवड केला होता. त्यासाठी त्यांना एक लाख ते सव्वा लाख रुपये खर्च आला होता. मात्र हा ऊस आता तोडणीला येऊन देखील, परिसरातील एकही कारखाना तो ऊस घेऊन जात नव्हता, गेल्या अनेक दिवसांपासून ऊस घेऊन जाण्यासाठी जाधव हे कारखान्याकडे चकरा मारत होतो. मात्र, त्यांना कारखान्याकडून निराशाच मिळाली, यामुळे नैराश्यात आलेल्या जाधव यांनी टोकाचं पाऊल उचललं आहे. त्यांनी ऊसाच्या फडाला पेटवून देत, फडातिलचं लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपविली आहे. जवळपास 30 ते 40 हजार मेट्रिक टन ऊस अद्यापही बीड जिल्हा शिल्लक असल्याचे सांगितले जाते. विशेष म्हणजे एकीकडे अतिरिक्त उसाचा प्रश्न गंभीर बनला असताना देखील कारखानदार मात्र मनमानीपणा करत आहेत. परजिल्ह्यातील ऊस आयात करत आहेत. यामुळे तळहाताच्या फोडा सारखा जपलेला ऊस कुठे घालावा ? असा प्रश्न शेतकऱ्यांपुढं उभा ठाकलाय. त्यामुळे आता संतप्त आणि हतास झालेल्या शेतकऱ्यांकडून, टोकाचं पाऊल उचलला जात असल्याचे चित्र बीड जिल्ह्यात निर्माण झालय. त्यामुळे आता साखर आयुक्त आणि सरकारने यावर तात्काळ तोडगा काढावा, अन्यथा शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशी प्रतिक्रिया शेतकरी संघटनेचे नेते राजेश नाईक यांनी दिली आहे.