३५० वर्षांची परंपरा असलेल्या माटुंगा मरूबाईचा चैत्री नवरात्रोत्सव सुरू
मुंबई- सुमारे ३५० वर्षांची परंपरा लाभलेल्या आणि माटुंग्याचे ग्रामदैवत असलेल्या श्री मरूबाई गावदेवीचा चैत्री नवरात्रोत्सव गुढीपाडव्यापासून धुमधडाक्यात सुरू झाला आहे.या उत्सवाची सांगता २३ एप्रिल रोजी चित्रा नक्षत्रावर मातेच्या पालखी मिरवणुकीने होणार आहे, अशी माहिती या देवस्थानचे विश्वस्त अनिल गावंड यांनी दिली.
श्री मरूबाईच्या या चैत्री नवरात्रोत्सव सोहळ्यात उद्या बुधवारी रामनवमी निमित्त विशेष भजन कार्यक्रम आयोजित केला आहे. तसेच रविवार २१ एप्रिल रोजी सकाळी ९ ते १२ यावेळेत श्री सूक्त महाअभिषेक, सोमवार २२ एप्रिल रोजी दिवसभरात नवचंडी हवन, पूर्णाहुती,महाआरती आणि सामूहिक प्रार्थना होणार आहे.तसेच मंगळवार २३ एप्रिल रोजी सायंकाळी ६ ते १० वाजेपर्यंत भव्य पालखी मिरवणूक आणि रात्री १० वाजता भाविकांना महाप्रसाद वाटप होणार आहे.या नवरात्र सोहळ्यामध्ये देवीच्या दर्शनासाठी दररोज भाविकांची मांदियाळी दिसून येत आहे.त्यामध्ये आगरी, कोळी,भंडारीसह मारवाडी गुजराती,पंजाबी आणि
दाक्षिणात्य भाविकांची मोठी संख्या असते.या मरूबाई मंदिर ट्रस्टतर्फे वर्षभर अनेक सामाजिक उपक्रम राबवले जात असतात.त्यामध्ये ‘रोटी बॅंक’ हा उपक्रम गरजूंना मोठा लाभदायी ठरत आहे. या उपक्रमामध्ये मंदिर ट्रस्टतर्फे टाटा रुग्णालयाजवळ रूग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना दररोज रोटी बॅंकेच्या माध्यमातुन रोटी,वरण,भात,
भाजी आणि गोड लाडू असे मोफत जेवण वाटप केले जाते.तरी भाविकांनी या सेवेसाठी आर्थिक सहकार्य करावे असे आवाहन विश्वस्त अनिल गावंड यांनी केले आहे.