आपलं जीवन समाजासाठी व्यतित करावे,बालकवी रुपेश तांबे यांचे प्रतिपादन
पालघर जिल्हा प्रतिनिधी
शिक्षकांकडे अफाट असे ज्ञान असते. या ज्ञानाचा समाजाला निरंतर उपयोग होणे अपेक्षित आहे. म्हणूनच सेवानिवृत्तीनंतर शिक्षकांनी उर्वरित आयुष्य समाजासाठी व्यतीत करावे असे मत बालकवी रुपेश तांबे यांनी व्यक्त केले.
दातिवरे शिक्षण संस्था संचालित दातिवरे इंग्लिश हायस्कूल दातिवरे येथील मुख्याध्यापक आत्माराम राठोड यांचा सेवापूर्ती सत्कार समारंभ इंग्लिश स्कूल दातीवरे विद्यालयाच्या सभागृहात मान्यवरांच्या उपस्थित पार पडला.या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून बालकवी तांबे उपस्थित होते. यावेळी तांबे यांनी सांगितले की, जर राजकारणामध्ये माणूस ८० वर्षापर्यंत काम करतो तर शिक्षण क्षेत्रामध्ये का करू नये. विद्यार्थ्यांना त्यांच्या बाल मनातील असंख्य प्रश्नांची उत्तरं शाळेच्या रूपाने त्यांना मिळत असतात. ही बालमनं जपणं गरजेचे आहे असे सांगून त्यांनी मुख्याध्यापक राठोड यांना भावी जीवनासाठी शुभेच्छा दिल्या.
सेवानिवृत्त होणारे मुख्याध्यापक आत्माराम राठोड यांचा संस्था, शाळा तसेच नातेवाईक मित्रमंडळी आणि विविध संघटनांच्या वतीने जाहीर सत्कार करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना मुख्याध्यापक राठोड यांनी संस्थेचे आभार व्यक्त केले तसेच सोबत असलेल्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसह शिक्षण क्षेत्रातील संघटनेच्या विविध पदाधिकाऱ्यांनी आपल्याला वेळोवेळी मार्गदर्शन करून सहकार्य केल्याबद्दल आभार व्यक्त केले.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दातिवरे शिक्षण संस्थेचे अध्यक्ष जगन्नाथ वर्तक होते. या वेळी प्रमुख अतिथी म्हणून बालकवी रुपेश तांबे, महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त प्रमोद पाटील, गणेश प्रधान, मुख्याध्यापक विलास पाटील, माजी मुख्याध्यापक विद्याधर पाटील, शालेय समिती अध्यक्ष हेमंत ठाकूर आदींनी सेवानिवृत्त मुख्याध्यापक आत्माराम राठोड यांच्या कार्याचा गौरव करून त्यांना सेवानिवृत्तीच्या शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमाचे प्रस्ताविक शाळेच्या ज्येष्ठ शिक्षिका मनिषा कुलकर्णी यांनी केले.तर सूत्रसंचालन सुशील ठाकूर यांनी केले. या कार्यक्रमाला सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि आजी-माजी विद्यार्थी, आणि संस्थेचे पदाधिकारी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.