भारतातील हरित क्रांतीचे खरे जनक डॉ. पंजाबराव देशमुख प्रा. डॉ.जयवंतराव इंगळे
भारतात सन 1960 नंतर जी पहिली हरित क्रांती घडून आली, तिचे खरे श्रेय डॉ. पंजाबराव देशमुख यांचेच असून तेच भारताच्या हरित क्रांतीचे खरे जनक आहेत, असे प्रतिपादन हुपरी येथील शेंडूरे कॉलेजमधील अर्थशास्त्र विषयाचे प्रोफेसर आणि अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ. जयवंतराव इंगळे यांनी केले. ते ब्रिक्स वर्ल्ड ऑफ ट्रॅडिशन्स, मोस्को, रशिया, रयत शिक्षण संस्था आणि एस. एम. जोशी कॉलेज, हडपसर यांनी हडपसर, पुणे येथे आयोजित केलेल्या अंतरविद्यशाखीय जागतिक परिषदेत बोलत होते. या परिषदेत डॉ. इंगळे यांनी ‘डॉ. पंजाबराव देशमुख यांनी भारतातील शेती आणि शेतकरी यांच्या विकासासाठी केलेले कार्य’ या विषयावर आपला शोधनिबंध सादर केला. डॉ. इंगळे यांनी पंजाबराव देशमुख यांनी स्वातंत्र्यपूर्व काळात आणि स्वातंत्र्य प्राप्ती नंतर भारताच्या शेती आणि शेतकरी, शेतमजूर यांच्या विकासासाठी केलेल्या कामगिरीची माहिती दिली. स्वातंत्र्यपूर्व काळात डॉ. देशमुख यांनी वऱ्हाड प्रांतात शेतीच्या विकासासाठी केलेल्या कामाची दखल घेऊन तत्कालीन पंत्रप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी अखिल भारतातील शेतकऱ्यांच्या कल्याणचे कार्य करण्याची जबाबदारी सोपवली.1952 ते 1962 या काळात पंजाबराव देशमुख केंद्रीय कृषी मंत्री होते. भारताला स्वातंत्र्य मिळाले तेंव्हा भारतीय शेती खूपच मागासलेली होती. शेतीची उत्पादकता खूपच कमी होती. बहुसंख्य शेतकरी दरिद्री आणि कर्जबाजारी होते. पंजाबराव देशमुख यांनी सन 1952 पासून शेतीच्या विकासाकडे विशेष लक्ष दिले. शेतीच्या विकासासाठी अनेक योजना राबवल्या. भारतात शेतकरी संघटना नव्हती. म्हणून त्यांनी 1955 मध्ये भारतीय कृषक समाज या संघटनेची स्थापना केली. सन 1960 मध्ये दिल्ली येथे सलग 92 दिवस जागतिक कृषी प्रदर्शन आयोजित केले.पंजाबराव देशमुख यांनी भारताच्या प्रत्येक राज्यात कृषी विद्यापीठे स्थापन केली. त्यांनी सहकारी शेतीला प्रोत्साहन दिले. भारतात तांदळाचे उत्पादन वाढावे यासाठी त्यांनी भारतात जपानी भात शेतीचे प्रयोग केले. तांदूळ उत्पादनातील तज्ञ म्हणून त्यांना जागतिक पातळीवर ओळखले जात होते.भारतात हरित क्रांती घडून येण्यासाठी पंजाबराव देशमुख यांनी आपली संपूर्ण हयात घालवली. ते केवळ विदर्भातील शेतकऱ्यांचे नेते न्हवते तर संपूर्ण भारतातील शेतकऱ्यांचे नेते व आधारस्तभ होते.त्यांच्यामुळेच भारतात हरित क्रांती घडून आली.