ग्रामीण भागामध्ये प्राथमिक शिक्षणाच्या माध्यमातून संस्कार रुजवण्याचे काम संस्कार गुरुकुल च्या माध्यमातून सुरू
इस्लामपूर: ग्रामीण भागामध्ये प्राथमिक शिक्षणाच्या माध्यमातून संस्कार रुजवण्याचे काम संस्कार गुरुकुल च्या माध्यमातून होत आहे, ही बाब अतिशय कौतुकास्पद असल्याचे मत तहसीलदार प्रदीप उबाळे यांनी मांडले. अमन एज्युकेशन सोसायटीच्या संस्कार गुरुकुल साखराळेच्या वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ व स्नेहसंमेलना प्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी राजारामबापू पाटील सहकारी कारखान्याचे उपाध्यक्ष विजय पाटील हे होते, तर प्रमुख उपस्थिती राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस आनंदराव पाटील यांची होती.
यावेळी बोलताना पुढे उबाळे म्हणाले,” प्राथमिक शिक्षण हा महत्त्वाचा टप्पा असून शिक्षणामध्ये संस्कार अतिशय मोलाचे आहेत. संस्कारातून सर्व गुणसंपन्न विद्यार्थी घडवणे हा शाळेचा मुख्य हेतू असणे गरजेचे आहे.” यावेळी बोलताना विजय पाटील म्हणाले,” ग्रामीण भागात कसदार शिक्षण देणारी संस्था म्हणून संस्कार गुरुकुल प्रयत्नशील असून मातीच्या गोळ्यांना घडविण्याचे सकारात्मक कार्य या माध्यमातून होत आहे.”
कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक अमन एज्युकेशन सोसायटीचे सचिव डॉ. सुरज चौगुले यांनी केले तर अहवाल वाचन संस्कार गुरुकुलच्या संचालिका सौ. अलमास संदे यांनी केले. यावेळी शशिकांत पाटील, किरण पाटील, सरपंच सुजाता डांगे, बाबुराव पाटील, सौ साजिदा मुल्ला, तजमुल चौगुले, आनंदराव दवणे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. राजेश्वरी कळसकर व मयुरी माने यांनी केले तर आभार तजमुल चौगुले यांनी मानले. यावेळी विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.